आपल्या वाचनसंस्कृतीचा सातबारा

(अर्थात मुंबईकर वाचतात काय व काय वाचतात?)

माणसं वाचतात! समजून-उमजून, जाणून-बुजून वाचतात.
बालपणी केव्हातरी बाराखडीतल्या अक्षरचित्रांची ओळख झाल्यापासून डोके आणि डोळे शाबूत असेपर्यंत माणसे वाचतच असतात.
उदाहरणार्थ रस्त्यावरच्या पाट्या, लोकलचे वेळापत्रक, रेस्तरॉंतील पदार्थांची यादी, पगाराची पावती व त्यात न मावणारी बिले असे काहीबाही माणसे सतत वाचतच असतात! त्यात अर्थातच विविध नियतकालिके वगैरे सटरफटर वाचनही येतेच! तेव्हा माणसे वाचत नाहीत, असे जे वृत्तपत्रांतून वगैरे काही थोर माणसे म्हणतात ते फिजूल ठरते. आता जर परिस्थितीच अशी असेल, तर मग आपले काही म्हणणे असावयाचे कारण नाही! पण वास्तविक प्रश्‍न माणसे वाचतात की नाही, असा मुळी नाहीच. सवाल माणसे काय वाचतात हा आहे.

अलीकडे काही थोर लोक असेही म्हणतात, की ज्याअर्थी साहित्यसंमेलने, पुस्तकजत्रा आदी जत्रांमधून पुस्तकांची किमानपक्षी लाखो रूपयांची खरेदी होते, व ज्याअर्थी लठ्ठवेतनधारी मराठी लब्धप्रतिष्ठितांच्या सदनिकांतील दिवाणखान्यातही पुस्तके ठेवण्यासाठीची सुबकचिमणी कपाटे इतमामाने मांडलेली दिसतात, त्याअर्थी महाराष्ट्रातील वाचनसंस्कृती चांगलीच संपन्न आहे! मध्यंतरी मुंबईत श्रीयुत राज ठाकरे यांनी गड-कोट-शस्त्रे-पुस्तके आदींची एकगठ्ठा जत्रा भरविली होती. तेव्हा तेथेही लोक भरभरून ग्रंथखरेदी करीत होते. असेच चित्र आपणांस मुंबईतील पुस्तकांच्या विविध दुकांनांतूनही दिसते व सवलतीत विक्री सुरू असेल त्या काळात हे चित्र अधिकच ठळक होते. म्हणजे एक नक्की झाले, की माणसे वाचतात व ती पुस्तके वाचतात. तेव्हा आपला सवाल अधिक सूक्ष्मकेंद्री करून असे विचारू या, की माणसे कोणती पुस्तके वाचतात?

साहजिकच यातून आपणांस बॅकेचे खातेपुस्तक, रेस्तरॉंतील मेन्यूपुस्तक अशी पुस्तके वगळावी लागतील! त्याचप्रमाणे आपणांस पाठ्यपुस्तकेही वगळावी लागतील. शालेय जीवनात जे वाचले जाते त्याचा वाचनसंस्कृतीशी काडीमात्र संबंध जडता कामा नये, अशी शपथ बहुधा आपण "बालभारती'च्या स्थापनेवेळीच घेतली असावी! तेव्हा आपणांस हे सर्व वगळून राहिलेल्या पुस्तकांकडे वळावे लागेल. आपण मुंबई किंवा तिच्या उपनगरांत वा जोडशहरांत राहात असल्याने आपणांस ही पुस्तके तशी सहज उपलब्ध होऊ शकतात. वाचनालये तर आपल्या आसपास असतातच. पुस्तके खरेदीच करावयाची ठरल्यास मात्र (अजूनही) ठाणे, दादर, पार्ले, वाशी, वसई अशी काही मोजकी ठिकाणी गाठावी लागतात किंवा मग फोर्ट, चर्चगेट, दादर आदी ठिकाणचे पदपथ धुंडाळावे लागतात. पेपरांतले उपसंपादक जसे गुपचूप कवी असतात, तसे काही रद्दीवालेही गुपचूप पुस्तकविक्रेते असतात! आता अशा पर्यावरणात माणूस पुस्तके वाचू लागला तर त्यास वास्तविक त्यांची ददात पडू नये. पण तसे होत नाही. मराठी मध्यमवर्गाच्या सध्याच्या पिढीच्या वाचनप्रियतेचा थर्मामीटर काही ठराविक पुस्तकांच्या व साहित्यिकांच्या रेषेवरच अडकताना दिसतो. मराठी वाचनसंस्कृतीचा लसावि समजा काढलाच तर त्यात लोकप्रिय पुस्तकांच्या यादीत "ययाती', "मृत्युंजय', "स्वामी', "श्रीमान योगी', "छावा', "पानिपत', "महानायक', "माझी जन्मठेप' अशी काही पुस्तके व लोकप्रिय (म्हणजे विद्यापीठे व वृत्तपत्रे यांतील नव्हे, तर ज्यांची पुस्तके लोक बहुसंख्यने वाचतात अशा) साहित्यिकांच्या यादीत पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे, वि. स. वाळिंबे, गो. नि दांडेकर, जयवंत दळवी, बा. मो. पुरंदरे, व. पु. काळे, नारायण धारप, सुहास शिरवळकर, गुरूनाथ नाईक, बाबा कदम, दुर्गा भागवत, सुनिता देशपांडे, सानिया, मेघना पेठे, अनिल अवचट अशी मंडळी येतात. शिवाय अधूनमधून तोंडीलावणे म्हणून दलि
त साहित्य, ग्रामीण साहित्याचा तिखटजाळही प्रिय वाटू लागतो. या उपर मराठी साहित्यात जे काही वेगळे प्रयोग होतात, जे काही वेगळे लिखाण होते, ते मात्र "साडेतीन टक्के' (म्हणजे मूठभर!) रसिकवाचक वगळता कुणाच्या गावीही नसते असे अगदी राजधानी मुंबईतील चित्र आहे. उदाहरणार्थ राजन खानसारखा दमदार कथालेखक सातत्याने लिहितो आहे, संजीव लाटकरांचे लेखन मंदावले असले, तरी अलीकडच्या काळात महानगरी संवेदनांचे पदर सोलणारा त्यांच्यासारखा कथाकार विरळाच आहे. पण होते काय, की हे असे लेखन बहुतांशी पेपरांतल्या लेखांपुरते, संमेलनांतल्या चर्चा-परिसंवादांपुरते मर्यादित राहते. पुस्तकाचा दर्जा त्याच्या खपावर ठरू नये, हे अजिबात मान्य. परंतु पुस्तकाचा खप चांगला नसेल, तर मग त्याला काय अर्थ?

मुद्दा असा, की मुंबईसारख्या ठिकाणी अलीकडे तर शॉपिंग मॉल्समध्येही पुस्तकांची दुकाने झाली असताना, मराठी साहित्याबद्दलची ही परिस्थिती असेल, तर पुन्हा तोच प्रश्‍न येतो, की मग मुंबईकर मराठी वाचक वाचतो तरी काय? वर म्हटल्याप्रमाणे जत्रा व संमेलनांमधून भरभरून ग्रंथखरेदी होत असेल, तर ती कशाची होते? मध्यंतरी मराठीतले एक जानेमाने प्रकाशक सांगत होते, की अलीकडे तर पुलंची पुस्तकेही पूर्वीसारखी खपत नाहीत! हे कशाने झाले आहे? काळ बदलला आहे, पिढी बदलली आहे हे तर आहेच. पण तेवढेच झालेले नाही. गेल्या काही पिढ्यांत जे झाले नव्हते ते गेल्या काही वर्षात झाले आहे.

No comments: